[ श्री रामदासस्वामिकृत् 'मनोबोध' ]
॥ मनाचे श्लोक ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा ।
Download mp3मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ मना सज्जना भक्तिपंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥ जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥ प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधी वदावा ॥ सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥ मना सर्वथा नीति सोडू नको हो । मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥ मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥ मना कल्पना ते नको वीषयांची । विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥ नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥ मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥ मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥ नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे । अति स्वार्थबुद्धी न रे पाप सांचे ॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे । न होता मनासारिखे दुःख मोठे ॥ ९ ॥ सदा सर्वदा प्रीति रामी धरावी । सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥ देहेदुःख ते सूख मानीत जावे । विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥ जनीं सर्वसूखी असा कोण आहे । विचारे मना तूचि शोधूनि पाहे ॥ मना त्वाचि रे पूर्वसंचीत केले । तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥ ११ ॥ मना मानसी दुःख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे ॥ विवेके देहेबुद्धि सोडूनि द्यावी । विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी ॥ १२ ॥ मना सांग पां रावणा काय जालें । अकस्मात ते राज्य सर्वै बुडालें ॥ म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं । बळे लागला काळ हा पाठिलागीं ॥ १३ ॥ जिवा कर्मयोगे जनीं जन्म जाला । परी शेवटी काळमूखी निमाला ॥ महाथोर ते मृत्युपंथेचि गेले । कितीएक ते जन्मले आणि मेले ॥ १४ ॥ मना पाहता सत्य हे मृत्युभूमी । जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥ चिरंजीव हे सर्वही मानिताती । अकस्मात सांडूनियां सर्व जाती ॥ १५ ॥ मरे एक त्याचा दुजा शोक वाहे । अकस्मात तोही पुढे जात आहे ॥ पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते । म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ॥ १६ ॥ मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते । अकस्मात होणार होऊन जाते ॥ घडे भोगणे सर्वही कर्मयोगे । मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥ १७ ॥ मना राघवेवीण आशा नको रे । मना मानवाची नको कीर्ति तू रे ॥ जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे । तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे ॥ १८ ॥ मना सर्वथा सत्य सांडू नको रे । मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥ मना सत्य ते सत्य वाचे वदावे । मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥ १९ ॥ बहू हिंपुटी होईजे मायपोटी । नको रे मना यातना तेचि मोठी ॥ निरोधे पचे कोंडिले गर्भवासी । अधोमूख रे दुःख त्या बाळकासी ॥ २० ॥ मना वासना चूकवी येरझारा । मना कामना सांडि रे द्रव्यदारा ॥ मना यातना थोर हे गर्भवासी । मना सज्जना भेटवी राघवासी ॥ २१ ॥ मना सज्जना हीत माझे करावे । रघूनायका दृढ चित्तीं धरावे ॥ महाराज तो स्वामि वायुसुताचा । जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२ ॥ न बोले मना राघवेवीण काही । जनी वाउगे बोलता सूख नाही ॥ घडीने घडी काळ आयुष्य नेतो । देहांती तुला कोण सोडूं पहातो ॥ २३ ॥ रघूनायकावीण वाया शिणावे । जनासारिखे व्यर्थ का वोसणावे ॥ सदा सर्वदा नाम वाचे वसो दे । अहंता मनी पापिणी ते नसो दे ॥ २४ ॥ मना वीट मानू नको बोलण्याचा । पुढे मागुता राम जोडेल कैचा ॥ सुखाची घडी लोटता सूख आहे । पुढे सर्व जाईल काही न राहे ॥ २५ ॥ देहेरक्षणा कारणे यत्न केला । परी शेवटी काळ घेऊन गेला । करी रे मना भक्ति या राघवाची । पुढे अंतरी सोडि चिंता भवाची ॥ २६ ॥ भवाच्या भये काय भीतोस लंडी । धरी रे मना धीर धाकासि सांडी ॥ रघूनायकासारिखा स्वामि शीरी । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥ दिनानाथ हा राम कोदंडधारी । पुढे देखता काळ पोटी थरारी ॥ मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥ पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे । बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे ॥ पुरी वाहिली सर्व जेणें विमानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २९ ॥ समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥ महासंकटी सोडिले देव जेणे । प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ॥ जयाते स्मरे शैलजा शूलपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१ ॥ अहल्या शिळा राघवे मुक्त केली । पदी लागता दिव्य होऊनि गेली ॥ जया वर्णिता शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३२ ॥ वसे मेरुमांदार हे सृष्टिलीळा । शशी सूर्य तारांगणे मेघमाळा ॥ चिरंजीव केले जनीं दास दोन्ही । नुपेक्षा कदा राम दासाभिमानी ॥ ३३ ॥ उपेक्षा कदा रामरूपी असेना । जिवा मानवा निश्चयो तो वसेना ॥ शिरी भार वाहेन बोले पुराणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३४ ॥ असे हो जया अंतरी भाव जैसा । वसे हो तया अंतरी देव तैसा ॥ अनन्यास रक्षीतसे चापपाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥ सदा सर्वदा देव सन्नीध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ॥ सुखानंद आनंद कैवल्यदानी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥ सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा । उडी घालितो संकटी स्वामि तैसा ॥ हरीभक्तिचा घाव गाजे निशाणी । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥ मना प्रार्थना तूजला एक आहे । रघूनाथ थक्कीत होऊनि पाहे ॥ अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३८ ॥ जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे । जयाचेनि योगे समाधान बाणे ॥ तयालागि हे सर्व चांचल्य दीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ३९ ॥ मना पाविजे सर्वही सूख जेथे । अती आदरे ठेविजे लक्ष तेथे ॥ विविके कुडी कल्पना पालटीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४० ॥ बहू हिंडता सौख्य होणार नाही । शिणावे परी नातुडे हीत काही ॥ विचारे बरे अंतरा बोधवीजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४१ ॥ बहुतांपरी हेचि आता धरावे । रघूनायका आपुलेसे करावे ॥ दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे । मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥ ४२ ॥ मना सज्जना एक जीवीं धरावे । जनीं आपुले हीत तूवां करावे ॥ रघूनायकावीण बोलो नको हो । सदा मानसी तो निजध्यास राहो ॥ ४३ ॥ मना रे जनीं मौनमुद्रा धरावी । कथा आदरे राघवाची करावी ॥ नसे राम ते धाम सोडूनि द्यावे । सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥ ४४ ॥ जयाचेनि संगे समाधान भंगे । अहंता अकस्मात येऊनि लागे ॥ तये संगतीची जनीं कोण गोडी । जिये संगतीने मती राम सोडी ॥ ४५ ॥ मना जे घडी राघवेवीण गेली । जनीं आपुली ते तुवा हानि केली ॥ रघूनायकावीण तो शीण आहे । जनीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥ ४६ ॥ मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे । जनीं जाणता भक्त होऊनि राहे ॥ गुणी प्रीति राखे क्रमू साधनाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥ सदा देवकाजी झिजे देह ज्याचा । सदा रामनामे वदे नित्य साचा ॥ स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥ सदा बोलण्यासारिखे चालताहे । अनेकी सदा एक देवासि पाहे ॥ सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥ नसे अंतरी कामकारी विकारी । उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥ निवाला मनीं लेश नाही तमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥ मदे मत्सरे सांडिली स्वार्थबुद्धी । प्रपंचीक नाही जयाते उपाधी ॥ सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥ क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादे । न लिंपे कदा दंभ वादे विवादे ॥ करी सूखसंवाद जो ऊगमाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२ ॥ सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकी । सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥ न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३ ॥ सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी । मिळेना कदा कल्पनेचेनि मेळी ॥ चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥ नसे मानसी नष्ट आशा दुराशा । वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा ॥ ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥ दिनाचा दयाळू मनाचा मवाळू । स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥ तया अंतरी क्रोध संताप कैचा । जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६ ॥ जगी होइजे धन्य या रामनामे । क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ॥ उदासीनता तत्त्वता सार आहे । सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥ नको वासना वीषयी वृत्तिरूपे । पदार्थी जडे कामना पूर्वपापे ॥ सदा राम निष्काम चिंतीत जावा । मना कल्पनालेश तोहि नसावा ॥ ५८ ॥ मना कल्पना कल्पिता कल्पकोटी । नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥ मनी कामना राम नाही जयाला । अती आदरे प्रीति नाही तयाला ॥ ५९ ॥ मना राम कल्पतरू कामधेनू । निधी सार चिंतामणी काय वानू ॥ जयाचेनि योगे घडे सर्व सत्ता । तया साम्यता कायसी कोण आता ॥ ६० ॥ उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे । तया अंतरी सर्वदा तेचि आहे ॥ जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा । पुढे मागतां शोक जीवी धरावा ॥ ६१ ॥ निजध्यास तो सर्व तूटोनी गेला । बळे अंतरी शोक संताप ठेला ॥ सुखानंद आनंद भेदे बुडाला । मनीं निश्चयो सर्व खेदे उडाला ॥ ६२ ॥ घरी कामधेनू पुढे ताक मागे । हरीबोध सांडोनि वेवाद लागे ॥ करी सार चिंतामणी काचखंडे । तया मागता देत आहे उदंडे ॥ ६३ ॥ अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना । अती काम त्या राम चित्ती वसेना ॥ अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा । अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४ ॥ नको दैन्यवाणे जिणे भक्तिऊणे । अती मूर्ख त्या सर्वदा दुःख दूणे ॥ धरी रे मना आदरे प्रीति रामी । नको वासना हेमधामी विरामी ॥ ६५ ॥ नव्हे सार संसार हा घोर आहे । मना सज्जना सत्य शोधूनि पाहे ॥ जनीं वीष खाता पुढे सूख कैचे । करी रे मना ध्यान या राघवाचे ॥ ६६ ॥ घनश्याम हा राम लावण्यरूपी । महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥ करी संकटी सेवकांचा कुडावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥ बळे आगळा राम कोदंडधारी । महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥ पुढे मानवा किंकरा कोण केवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥ सुखानंदकारी निवारी भयाते । जनीं भक्तिभावे भजावे तयाते ॥ विवेके त्यजावा अनाचार हेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥ सदा रामनामे वदा पूर्णकामे । कदा बाधिजेना पदा नित्य नेमे ॥ मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७० ॥ जयाचेनि नामे महादोष जाती । जयाचेनि नामे गती पाविजेती ॥ जयाचेनि नावे घडे पुण्यठेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥ न वेचें कदा ग्रंथिचे अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही ॥ महाघोर संसारशत्रू जिणावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥ देहेदंडणेचे महादुःख आहे । महादुःख ते नाम घेता न राहे ॥ सदाशीव चिंतीतसे देवदेवा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥ बहुतांपरी संकटे साधनांची । व्रते दान उद्यापने ती धनाची ॥ दिनाचा दयाळू मनी आठवावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥ समस्तांमधे सार साचार आहे । कळेना तरी सर्व शोधून पाहे ॥ जिवा संशयो वाऊगा तो त्यजावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥ नव्हे कर्म ना धर्म ना योग काही । नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही ॥ म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥ करी काम निष्काम या राघवाचे । करी रूप स्वरूप सर्वां जिवांचे ॥ करी छेद निर्द्वंद्व हे गूण गाता । हरीकीर्तनी वृत्तिविश्वास होता ॥ ७७ ॥ अहो ज्या नरा रामविश्वास नाही । तया पामरा बाधिजे सर्व काही ॥ महाराज तो स्वामि कैवल्यदाता । वृथा वाहणे देहसंसारचिंता ॥ ७८ ॥ मना पावना भावना राघवाची । धरी अंतरी सोडि चिंता भवाची ॥ भवाची जिवा मानवा भूलि ठेली । नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥ ७९ ॥ धरा श्रीवरा त्या हरा अंतराते । तरा दुस्तरा त्या परा सागराते ॥ सरा वीसरा त्या भरा दुर्भराते । करा नीकरा त्या खरा मत्सराते ॥ ८० ॥ मना मत्सरे नाम सांडू नको हो । अती आदरे हा निजध्यास राहो ॥ समस्तांमधे नाम हे सार आहे । दुजी तूळणा तूळितांही न साहे ॥ ८१ ॥ बहू नाम या रामनामी तुळेना । अभाग्या नरा पामरा हे कळेना ॥ विषा औषधा घेतले पार्वतीशे । जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥ ८२ ॥ जेणे जाळिला काम तो राम ध्यातो । उमेसी अती आदरे गूण गातो ॥ बहु ज्ञ्य़ान वैराग्य सामर्थ्य जेथे । परी अंतरी नामविश्वास तेथे ॥ ८३ ॥ विठोने शिरी वाहिला देवराणा । तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ॥ निवाला स्वये तापसी चंद्रमौळी । जिवा सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८४ ॥ भजा राम विश्राम योगेश्वरांचा । जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥ स्वये नीववी तापसी चंद्रमौळी । तुम्हां सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८५ ॥ मुखी राम विश्राम तेथेचि आहे । सदानंद आनंद सेवूनि राहे ॥ तयावीण तो शीण संदेहकारी । निजधाम हे नाम शोकापहारी ॥ ८६ ॥ मुखी राम त्या काम बाधू शकेना । गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना ॥ हरीभक्त तो शक्त कामास मारी । जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥ बहू चांगले नाम या राघवाचे । अती साजिरे स्वल्प सोपे फुकाचे ॥ करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें । जिवा मानवा हेचि कैवल्य साचे ॥ ८८ ॥ जनीं भोजनीं नाम वाचे वदावे । अती आदरे गद्यघोषे म्हणावे ॥ हरीचिंतने अन्न सेवीत जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ ८९ ॥ न ये राम वाणी तया थोर हाणी । जनीं व्यर्थ प्राणी तया नाम काणी ॥ हरीनाम हे वेदशास्त्री पुराणी । बहू आगळे बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥ नको वीट मानू रघूनायकाचा । अती आदरे बोलिजे राम वाचा ॥ न वेचे मुखी सापडे रे फुकाचा । करी घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१ ॥ अती आदरे सर्वही नामघोषे । गिरीकंदरी जाईजे दूरि दोषे ॥ हरी तिष्ठतू तोषला नामघोषे । विशेषे हरा मानसी रामपीसे ॥ ९२ ॥ जगी पाहता देव हा अन्नदाता । तया लागली तत्त्वता सार चिंता ॥ तयाचे मुखी नाम घेता फुकाचे । मना सांग पा रे तुझे काय वेचे ॥ ९३ ॥ तिन्ही कोप जाळू शके कोप येता । निवाला हरू तो मुखे नाम घेता ॥ जपे आदरे पार्वती विश्वमाता । म्हणोनी म्हणा तेचि हे नाम आता ॥ ९४ ॥ अजामेळ पापी वदे पुत्रकामे । तया मुक्ति नारायणाचेनि नामे ॥ शुकाकारणे कुंटणी राम वाणी । मुखे बोलिता ख्याति जाली पुराणी ॥ ९५ ॥ महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी । जपे रामनामावळी नित्यकाळी ॥ पिता पापरूपी तया देखवेना । जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ॥ ९६ ॥ मुखी नाम नाही तया मुक्ति कैची । अहंतागुणे यातना ते फुकाची ॥ पुढे अंत येईल तो दैन्यवाणा । म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥ ९७ ॥ हरीनाम नेमस्त पाषाण तारी । बहू तारिले मानव देहधारी ॥ तया रामनामी सदा जो विकल्पी । वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८ ॥ जगी धन्य वाराणसी पुण्यराशी । तयेमाजि आता गती पूर्वजांसी ॥ मुखे रामनामावळी नित्यकाळी । जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९ ॥ यथासांग रे कर्म तेही घडेना । घडे धर्म ते पुण्यगाठी पडेना ॥ दया पाहता सर्व भूती असेना । फुकाचे मुखी नाम तेही वसेना ॥ १०० ॥ जया नावडे नाम त्या यम जाची । विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥ म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे । मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥ १०१ ॥
अती लीनता सर्वभावे स्वभावे ।
जना सज्जनालागि संतोषवावे ॥ देहे कारणी सर्व लावीत जावे । सगूणी अती आदरेसी भजावे ॥ १०२ ॥ हरीकीर्तनी प्रीति रामी धरावी । देहेबुद्धि नीरूपणी वीसरावी ॥ परद्रव्य आणीक कांता परावी । यदर्थी मना सांडि जीवी करावी ॥ १०३ ॥ क्रियेवीण नानापरी बोलिजेते । परी चित्त दुश्चित्त ते लाजवीते ॥ मना कल्पना धीट सैराट धांवे । तया मानवा देव कैसेनि पावे ॥ १०४ ॥ विवेके क्रिया आपुली पालटावी । अती आदरे शुद्ध क्रीया धरावी ॥ जनीं बोलण्यासारिखे चाल बापा । मना कल्पना सोडि संसारतापा ॥ १०५ ॥ बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा । विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ॥ दया सर्वभूती जया मानवाला । सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला ॥ १०६ ॥ मना कोप आरोपणा ते नसावी । मना बुद्धि हे साधुसंगी वसावी ॥ मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी । मना होइ रे मोक्षभागी विभागी ॥ १०७ ॥ मना सर्वदा सज्जनाचेनि योगे । क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥ क्रियेवीण वाचाळता ते निवारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८ ॥ जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा । जनीं सूखसंवाद सूखे करावा ॥ जगी तोचि तो शोकसंतापहारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९ ॥ तुटे वाद संवाद त्याते म्हणावे । विवेके अहंभाव याते जिणावे ॥ अहंतागुणे वाद नाना विकारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११०॥ हिताकारणे बोलणे सत्य आहे । हिताकारणे सर्व शोधूनि पाहे ॥ हिताकारणे बंड पाखांड वारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११ ॥ जनीं सांगता ऐकता जन्म गेला । परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥ उठे संशयो वाद हा दंभधारी । तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११२ ॥ जनीं हीत पंडीत सांडीत गेले । अहंतागुणे ब्रह्मराक्षस जाले ॥ तयाहून व्युत्पन्न तो कोण आहे । मना सर्व जाणीव सांडूनि राहे ॥ ११३ ॥ फुकाचे मुखी बोलता काय वेचे । दिसेंदीस अभ्यंतरी गर्व सांचे ॥ क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे । विचारे तुझा तूचि शोधूनि पाहे ॥ ११४ ॥ तुटे वाद संवाद तेथे करावा । विवेके अहंभाव हा पालटावा ॥ जनीं बोलण्यासारखे आचरावे । क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ॥ ११५ ॥ बहू शापिता कष्टला अंबऋषी । तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ॥ दिला क्षीरसिंधु तया ऊपमानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११६ ॥ धुरू लेंकरु बापुडे दैन्यवाणे । कृपा भाकिता दीधली भेटि जेणे ॥ चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥ गजेंद्रू महासंकटी वास पाहे । तयाकारणे श्रीहरी धावताहे ॥ उडी घातली जाहला जीवदानी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८ ॥ अजामेळ पापी तया अंत आला । कृपाळूपणे तो जनीं मुक्त केला ॥ अनाथासि आधार हा चक्रपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११९ ॥ विधीकारणे जाहला मत्स्य वेगी । धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी ॥ जना रक्षणाकारणे नीच योनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२० ॥ महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला । म्हणोनी तयाकारणे सिंह जाला ॥ न ये ज्वाळ वीशाळ सन्नीध कोणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२१ ॥ कृपा भाकिता जाहला वज्रपाणी । तया कारणे वामनू चक्रपाणी ॥ द्विजांकारणे भार्गवू चापपाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२२ ॥ अहल्येसतीलागी आरण्यपंथे । कुडावा पुढे देव बंदी तयांतें ॥ बळे सोडिता घाव घाली निशाणी । नुपेक्षी कदा राम भक्ताभिमानी ॥ १२३ ॥ तये द्रौपदीकारणे लागवेगे । त्वरे धावतो सर्व सांडूनि मागे ॥ कळीलागि जाला असे बोध्य मौनी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२४ ॥ अनाथां दिनांकारणे जन्मताहे । कलंकी पुढे देव होणार आहे ॥ जया वर्णिता शीणली वेदवाणी । नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२५ ॥ जनांकारणे देव लीलावतारी । बहुतांपरी आदरे वेषधारी ॥ तया नेणती ते जन पापरूपी । दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी ॥ १२६ ॥ जगी धन्य तो राममूखे निवाला । कथा ऐकता सर्व तल्लीन जाला ॥ देहेभावना रामबोधे उडाली । मनोवासना रामरूपी बुडाली ॥ १२७ ॥ मना वासना वासुदेवी वसो दे । मना वासना कामसंगी नसो दे ॥ मना कल्पना वाउगी ते न कीजे । मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥ गतीकारणे संगती सज्जनाची । मती पालटे सूमती दुर्जनाची ॥ रतीनायिकेचा पती नष्ट आहे । म्हणोनी मनातीत होऊनी राहे ॥ १२९ ॥ मना अल्प संकल्प तोही नसावा । सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा ॥ जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा । रमाकांत एकांतकाळी भजावा ॥ १३० ॥ भजाया जनीं पाहता राम एकू । करी बाण एकू मुखी शब्द एकू ॥ क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू । धरा जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥ विचारूनि बोले विवंचूनि चाले । तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥ बरे शोधल्यावीण बोलो नको हो । जनीं चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥ १३२ ॥ हरीभक्त वीरक्त विज्ञ्यान राशी । जेणे मानसी स्थापिले निश्चयासी ॥ तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे । तया भाषणे नष्ट संदेह मोडे ॥ १३३ ॥ नसे गर्व आंगी सदा वीतरागी । क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥ नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा । इही लक्षणी जाणिजे योगिराणा ॥ १३४ ॥ धरी रे मना संगती सज्जनाची । जेणे वृत्ति हे पालटे दुर्जनाची ॥ बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे । महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥ १३५ ॥ भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे । भयातीत ते संत आनंत पाहे ॥ जया पाहता द्वैत काही दिसेना । भय मानसी सर्वथाही असेना ॥ १३६ ॥ जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले । परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥ देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३७ ॥ भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त जाले । जिवा जन्मदारिद्र ठाकूनि आले ॥ देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३८ ॥ पुढे पाहता सर्वही कोंदलेसे । अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे ॥ अभावे कदा पुण्य गाठी पडेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १३९ ॥ जयाचे तया चूकले प्राप्त नाही । गुणे गोविले जाहले दुःख देही ॥ गुणावेगळी वृत्ति तेही वळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १४० ॥ म्हणे दास सायास त्याचे करावे । जनीं जाणता पाय त्याचे धरावे ॥ गुरू अंजनेवीण ते आकळेना । जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥ १४१ ॥ कळेना कळेना कळेना ढळेना । ढळे नाढळे संशयोही ढळेना ॥ गळेना गळेना अहंता गळेना । बळे आकळेना मिळेना मिळेना ॥ १४२ ॥ अविद्यागुणे मानवा ऊमजेना । भ्रमे चूकले हीत ते आकळेना ॥ परीक्षेविणे बांधले दृढ नाणे । परी सत्य मिथ्या असे कोण जाणे ॥ १४३ ॥ जगीं पाहतां साच ते काय आहे । अती आदरे सत्य शोधून पाहे ॥ पुढे पाहतां पाहतां देव जोडे । भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥ सदा वीषयो चिंतिता जीव जाला । अहंभाव अज्ञान जन्मास आला ॥ विवेके सदा स्वस्वरूपी भरावे । जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावे ॥ १४५ ॥ दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी । अकस्मात आकारले काळ मोडी ॥ पुढे सर्व जाईल काही न राहे । मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४६ ॥ फुटेना तुटेना चळेना ढळेना । सदा संचले मीपणे ते कळेना ॥ तया एकरूपासि दूजे न साहे । मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४७ ॥ निराकार आधार ब्रह्मादिकांचा । जया सांगता शीणली वेदवाचा ॥ विवेके तदाकार होऊनि राहे । मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४८ ॥ जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे । जगीं पाहतां ज्ञानचक्षीं निरक्षे ॥ जनीं पाहता पाहणे जात आहे । मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १४९ ॥ नसे पीत ना श्वेत ना श्याम काही । नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही ॥ म्हणे दास विश्वासता मुक्ति लाहे । मना संत आनंत शोधूनि पाहे ॥ १५० ॥ खरे शोधितां शोधितां शोधिताहे । मना बोधितां बोधितां बोधिताहे ॥ परी सर्वही सज्जनाचेनि योगे । बरा निश्चयो पाविजे सानुरागे ॥ १५१ ॥ बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा । परी अंतरी पाहिजे तो निवाडा ॥ मना सार साचार ते वेगळे रे । समस्तांमधे एक ते आगळे रे ॥ १५२ ॥ नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने । समाधान काही नव्हे तानमाने ॥ नव्हे योगयागे नव्हे भोगत्यागे । समाधान ते सज्जनाचेनि योगे ॥ १५३ ॥ महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे । खुणे पाविजे संतसंगे विवर्णे ॥ द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो । तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो ॥ १५४ ॥ दिसेना जनीं तेची शोधूनि पाहे । बरे पाहता गूज तेथेचि आहे ॥ करी घेऊ जाता कदा आढळेना । जनीं सर्व कोंदाटले ते कळेना ॥ १५५ ॥ म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहे । अतर्कासि तर्की असा कोण आहे ॥ जनीं मीपणे पाहता पाहवेना । तया लक्षिता वेगळे राहवेना ॥ १५६ ॥ बहू शास्त्र धुंडाळिता वाड आहे । जया निश्चयो येक तोही न साहे ॥ मती भांडती शास्त्रबोधे विरोधे । गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे ॥ १५७ ॥ श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे । स्मृती वेद वेदांतवाक्ये विचित्रे ॥ स्वये शेष मौनावला स्थीर पाहे । मना सर्व जाणीव सांडून राहे ॥ १५८ ॥ जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची । तया भोजनाची रुची प्राप्त कैची ॥ अहंभाव ज्या मानसीचा विरेना । तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना ॥ १५९ ॥ नको रे मना वाद हा खेदकारी । नको रे मना भेद नाना विकारी ॥ नको रे मना शीकवू पूढिलांसी । अहंभाव जो राहिला तूजपासी ॥ १६० ॥ अहंतागुणे सर्वही दुःख होते । मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते ॥ सुखी राहता सर्वही सूख आहे । अहंता तुझी तुंची शोधून पाहे ॥ १६१ ॥ अहंतागुणे नीति सांडी विवेकी । अनीतीबळे श्लाघ्यता सर्व लोकी ॥ परी अंतरी सर्वही साक्ष येते । प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते ॥ १६२ ॥ देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला । देहातीत ते हीत सांडीत गेला ॥ देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६३ ॥ मने कल्पिला वीषयो सोडवावा । मने देव निर्गूण तो ओळखावा ॥ मने कल्पिता कल्पना ते सरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६४ ॥ देहादीक प्रपंच हा चिंतियेला । परी अंतरी लोभ निश्चित ठेला ॥ हरीचिंतने मुक्तिकांता वरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६५ ॥ अहंकार विस्तारला या देहाचा । स्त्रियापुत्रमित्रादिकें मोह त्यांचा ॥ बळे भ्रांति हे जन्मचिंता हरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६६ ॥ बरा निश्चयो शाश्वताचा करावा । म्हणे दास संदेह तो वीसरावा ॥ घडीने घडी सार्थकाची करावी । सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६७ ॥ करी वृत्ती जो संत तो संत जाणा । दुराशागुणे जो नव्हे दैन्यवाणा ॥ उपाधी देहेबुद्धीते वाढवीते । परी सज्जना केवि बाधू शके ते ॥ १६८ ॥ नसे अंत आनंत संता पुसावा । अहंकारविस्तार हा नीरसावा ॥ गुणेंवीण निर्गूण तो आठवावा । देहेबुद्धिचा आठवू नाठवावा ॥ १६९ ॥ देहेबुद्धि हे ज्ञानबोधे त्यजावी । विवेके तये वस्तुची भेटी घ्यावी ॥ तदाकार हे वृत्ति नाही स्वभावे । म्हणोनि सदा तेचि शोधीत जावे ॥ १७० ॥ असे सार साचार ते चोरलेसे । इही लोचनी पाहता दृश्य भासे ॥ निराभास निर्गूण ते आकळेना । अहंतागुणे कल्पिताही कळेना ॥ १७१ ॥ स्फुरे वीषयी कल्पना ते अविद्या । स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ॥ मुळी कल्पना दो रुपे तेचि जाली । विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली ॥ १७२ ॥ स्वरूपी उदेला अहंकार राहो । तेणे सर्व आच्छादिले व्योम पाहो ॥ दिशा पाहता ते निशा वाढताहे । विवेके विचारे विवंचूनि पाहे ॥ १७३ ॥ जया चक्षुने लक्षिता लक्षवेना । भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना ॥ क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो । दयादक्ष तो साक्षिने पक्ष घेतो ॥ १७४ ॥ विधी निर्मितां लीहितो सर्व भाळी । परी लीहिता कोण त्याचे कपाळी ॥ हरू जाळितो लोक संहारकाळी । परी शेवटी शंकरा कोण जाळी ॥ १७५ ॥ जगी द्वादशादित्य हे रुद्र अक्रा । असंख्यात संख्या करी कोण शक्रा ॥ जगी देव धुंडाळिता आढळेना । जगी मुख्य तो कोण कैसा कळेना ॥ १७६ ॥ तुटेना फुटेना कदा देवराणा । चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ॥ कळेना कळेना कदा लोचनासी । वसेना दिसेना जगी मीपणासी ॥ १७७ ॥ जया मानला देव तो पूजिताहे । परी देव शोधूनि कोणी न पाहे ॥ जगी पाहता देव कोट्यानुकोटी । जया मानली भक्ति जे तेचि मोठी ॥ १७८ ॥ तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले । तया देवरायासि कोणी न बोले ॥ जगी थोरला देव तो चोरलासे । गुरूवीण तो सर्वथाही न दीसे ॥ १७९ ॥ गुरु पाहतां पाहतां लक्ष कोटी । बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी ॥ मनी कामना चेटके धातमाता । जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ॥ १८० ॥ नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदू । नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू ॥ नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू । जनीं ज्ञानिया तोचि साधू अगाधू ॥ १८१ ॥ नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी । क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ॥ मुखे बोलिल्यासारखे चालताहे । मना सद्गुरू तोचि शोधूनि पाहे ॥ १८२ ॥ जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरागी । कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी ॥ प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे । तयाचेनि योगे समाधान बाणे ॥ १८३ ॥ नव्हे तेंचि जाले नसे तेंचि आले । कळों लागले सज्जनाचेनि बोले ॥ अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे । मना संत आनंत शोधीत जावे ॥ १८४ ॥ लपावे अती आदरे रामरूपी । भयातीत निश्चीत ये स्वस्वरूपी ॥ कदा तो जनीं पाहताही दिसेना । सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ॥ १८५ ॥ सदा सर्वदा राम सन्नीध आहे । मना सज्जना सत्य शोधून पाहे ॥ अखंडीत भेटी रघूराजयोगू । मना सांडि रे मीपणाचा वियोगू ॥ १८६ ॥ भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे । परी सर्वही स्वस्वरूपी न साहे ॥ मना भासले सर्व काही पहावे । परी संग सोडूनि सूखी रहावे ॥ १८७ ॥ देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे । विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे ॥ विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे । परी संग सोडूनि सूखे रहावे ॥ १८८ ॥ मही निर्मिली देव तो ओळखावा । जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा ॥ तया निर्गुणालागी गूणी पहावे । परी संग सोडूनि सूखी रहावे ॥ १८९ ॥ नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता । परेहून पर्ता न लिंपे विवर्ता ॥ तया निर्विकल्पासि कल्पीत जावे । परी संग सोडूनि सूखी रहावे ॥ १९० ॥ देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना । तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना ॥ परब्रह्म ते मीपणे आकळेना । मनी शून्य अज्ञान हे मावळेना ॥ १९१ ॥ मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे । दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचे ॥ तया खूण ते हीन दृष्टांत पाहे । तेथे संग निःसंग दोन्ही न साहे ॥ १९२ ॥ नव्हे जाणता नेणता देवराणा । न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा ॥ नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा । श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥ १९३ ॥ वसे हृदयी देव तो कोण कैसा । पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा ॥ देहे टाकिता देव कोठे रहातो । परी मागुता ठाव कोठे पहातो ॥ १९४ ॥ वसे हृदयी देव तो जाण ऐसा । नभाचेपरी व्यापकू जाण तैसा ॥ सदा संचला येत ना जात काही । तयावीण कोठे रिता ठाव नाही ॥ १९५ ॥ नभी वावरे जो अणूरेणु काही । रिता ठाव या राघवेवीण नाही ॥ तया पाहता पाहता तेंचि जाले । तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ॥ १९६ ॥ नभासारिखे रूप या राघवाचे । मनी चिंतिता मूळ तूटे भवाचे ॥ तया पाहता देहबुद्धि उरेना । सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ॥ १९७ ॥ नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे । रघूनायका ऊपमा ते न साहे ॥ दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे । तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ॥ १९८ ॥ अती जीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे । तेथे तर्क संपर्क तोही न साहे ॥ अती गूढ ते दृश्य तत्काळ सोपे । दुजेवीण जे खूण स्वामिप्रतापे ॥ १९९ ॥ कळे आकळे रूप ते ज्ञान होता । तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था ॥ मना उन्मनी शब्द कुंठीत राहे । तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहे ॥ २०० ॥ कदा ओळखीमाजि दूजे दिसेना । मनी मानसी द्वैत काही वसेना ॥ बहूतां दिसां आपली भेटि जाली । विदेहीपणे सर्व काया निवाली ॥ २०१ ॥ मना गूज रे तूज हे प्राप्त झाले । परी अंतरी पाहिजे यत्न केले ॥ सदा श्रवणे पाविजे निश्चयासी । धरी सज्जनसंगती धन्य होसी ॥ २०२ ॥ मना सर्वही संग सोडूनि द्यावा । अती आदरे सज्जनाचा धरावा ॥ जयाचेनि संगे महादुःख भंगे । जनीं साधनेवीण सन्मार्ग लागे ॥ २०३ ॥ मना संग हा सर्वसंगास तोडी । मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी ॥ मना संग हा साधकां शीघ्र सोडी । मना संग हा द्वैत निःशेष मोडी ॥ २०४ ॥ मनाची शते ऐकता दोष जाती । मतीमंद ते साधना योग्य होती ॥ चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी । म्हणे दास विश्वासता मुक्ति भोगी ॥ २०५ ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
|
- आपली उपनिषदेप्रस्तावनादशोपनिषदेवैष्णव उपनिषदेशैव उपनिषदेशाक्त उपनिषदेसामान्य उपनिषदेसंन्यास उपनिषदेयोगोपनिषदे
- भगवद् गीताप्रस्तावनाअध्याय १ लाअध्याय २ लाअध्याय ३ लाअध्याय ४ लाअध्याय ५ लाअध्याय ६ लाअध्याय ७ लाअध्याय ८ लाअध्याय ९ लाअध्याय १० लाअध्याय ११ लाअध्याय १२ लाअध्याय १३ लाअध्याय १४ लाअध्याय १५ लाअध्याय १६ लाअध्याय १७ लाअध्याय १८ लापंचदशीप्रस्तावनातत्त्वविवेकःभूतविवेकःपञ्चकोषविवेकःद्वैतविवेकःमहावाक्यविवेकःचित्रदीपःतृप्तिदीपःकूटस्थ दीपःध्यानदीपःनाटक दीपःब्रह्मानन्दे योगानन्दःब्रह्मानन्दे आत्मानन्दःब्रह्मानन्दे अद्वैतानन्दःब्रह्मानन्दे विद्यानन्दःब्रह्मानन्दे विषयानन्दःनारद भक्तिसूत्रेशांडिल्य भक्तिसूत्रेविवेकचूडामणि
No comments:
Post a Comment